Thursday, February 17, 2022

1007 जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार..



653 ग्रामसभेचे ठराव झाले, विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर

अहमदनगर(प्रतिनिधी):-


राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जातीऐवजी आता या वस्त्यांना समता नगर,भीम नगर,ज्योती नगर,शाहू नगर,क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येणार आहेत.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात अशा प्रकारे 1007 ठिकाणी जातीनूसार वस्त्यांची नावे असून ती बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


जिल्ह्यात समाज कल्याण विभागाने यासाठी प्रक्रिया सुरू केली असून 653 ठिकाणी ग्रामसभा घेवून जातीऐवजी अन्य नावे त्याठिकाणी देण्यात येणार आहे. संबंधीत वस्तीमध्ये झालेल्या ग्रामसभेच्या ठरावासह पंचायत समिती मार्फत नाव बदला प्रस्ताव जिल्हा परिषद आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. 


विभागीय आयुक्त हे सर्व ठराव राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात येणार असून शासन पातळीवर संबंधीत वस्त्यांची नावे बदलण्याचे गॅझेट प्रसिध्द झाल्यानंतर संबंधीत वस्तीला नवीन नावे मिळणर आहेत. या महिनाअखेर जिल्ह्यातील 1007 ठिकाणी वस्त्यांची नावे बदलण्यासाठी ग्रामसभा घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. जिल्ह्यात 4 हजार 275 एकूण वस्त्या आहेत.


काही ठराव विरोधातही:-

जिल्ह्यात 1007 पैकी काही ठिकाणी मूळ नावे ठेवण्यात यावेत, असे ठराव ही झालेले आहेत. यामुळे संबंधीत ठिकाणी पूर्वीचे नाव राहणार आहेत. नावे बदलण्यासाठी सक्तीचे नसल्याचे सांगण्यात आले. मात्र,सामाजिक समतोल साधण्यासाठी नावात बदल असणे गरजेचे असल्याचे मत समाज कल्याण विभागाने नोंदवले.


याठिकाणी झाले ठराव:-

संगमनेर 27, कोपरगाव 10, राहाता 47, अकोले 20, श्रीरामपूर 13, राहुरी 37, नेवासा 36, शेवगाव 96, पाथर्डी 143, जामखेड 39, कर्जत 43, श्रीगोंदा 32, पारनेर 110 आणि नगर 0.




लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment