लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत निवडणूका गावोगावी संपन्न झाल्या, काहींचा दणदणीत विजय होईल,काहींचा दारुण पराभव होईल तर कोणी काठावर निवडून येईल तर कोणी थोडक्यात अपयशी ठरेल. काहींनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली यात काही यशस्वी होतील तर काही अपयशी.गावकीच राजकारण फार बेकार असते.
सत्तेचा सारीपाट हा गेली एक महिन्यापासून आपण आप- आपल्या गावात अनुभवला, निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे, आलेल्या सणाचा, वाढदिवसाचाही उपयोग करून घेणे, प्रचार प्रभावी कसा होईल यासाठी वाटेल ते करणे यामुळे नकळत आपलेच आपल्या विरोधात गेले, कोण हा वार्डात तर कोणी विरोधी वार्डात. घरातली, रक्ताची नाती प्रतिस्पर्धी बनली, एकमेकांचे उणेंदुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे.मीच कसा चांगला किंवा माझी पार्टी, पॅनल कसा चांगला हे पटवून देण्यात आले.
उमेदवारांनी दिवसाची रात्र केली, ढाबे, पार्ट्या रंगल्या, विकासकामांचे जाहिरनामे, विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालीवरती बसवलेली गाणी, सोशल मीडिया ग्रुप, एलईडी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा घेत प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.
गुलाल कुणाचाही असो सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत, आपलीच आहेत, कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो, शांत रहा संयमी रहा, मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे, आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनच झालं इलेक्शन आता जपा रिलेशन हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती प्रत्येक गावात जपली पाहिजे. सर्वांनी एकच कानमंत्र ध्यानात घ्यायला पाहिजे. तो म्हणजे
झालं इलेक्शन.........जपा रिलेशन.



















