Sunday, July 24, 2022

गुंडेगाव येथे घाणीचे साम्राज्य; साफ-सफाई करण्याची मागणी.. ;नागरिकांचे आरोग्य धोक्यात, सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो कचरा, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज

गुंडेगाव (प्रतिनिधी)


गुंडेगाव ता.नगर येथील ग्रामपंचायत गावठाण हद्दीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून गाव परिसरात प्लॅस्टिक,कागदे, सडलेले पालेभाज्या तसेच अनेक झाडं झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे


तसेच गुंडेगाव येथून जवळ असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसराच्या चहुबाजूंनी घाण कचरा,मावा, तंबाखूचे जन्य कचरा पसरल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच सध्या पावसामुळे हा कचरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नसल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नाही किंवा त्याबाबत कुठल्याच उपाय योजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे.

 
गुंडेगाव हे गाव सध्या समस्याने वेढलेले आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता गृह,कचरा कुंडी, आरोग्य विभागाचे कुठलेच नियोजन नसणे,विद्युत पुरवठा सुरळीत नसणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

  सध्या पावसाळ्यात काही नागरी रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण होताना दिसत आहे. तसेच संपूर्ण गावातील या समस्यांवर उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे सर्वच स्तरातून तक्रारी होताना पहावयास मिळत आहे.अनेक वेळा प्रशासनाला सांगण्यात आले असुन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याची पाहून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

  

 

ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला रविवारी आठवडे बाजार भरतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बाजूला सुद्धा घाणीचे ढीग तयार झाले आहेत.याकडे ग्रामपंचायत सफाई कामगार असुन नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे.अशावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष न देता हम करे सो कायदा अशीच भूमिका घेतली आहे.साथीच्या  परिस्थिती मध्ये तरी परिसराची  स्वच्छता होणे अपेक्षित असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर यासारखं जनतेचे दुर्दैव नाही.  


   गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्त्यावर देखील घाण पसरलेली पाहावयास मिळत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने चिखलमय रस्ता झाला आहे‌. त्यामुळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांना, वाहनचालक, वयोवृद्ध महिला नागरिक यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होताना दिसत आहे.बस स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही.त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शौचालय बांधले गेले नसल्याने नागरिक उघड्यावर शौचाला जात आहेत. त्यामुळे हागणदारी फलक निव्वळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी,यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत..


चौकट....

"गुंडेगाव परिसरात स्वच्छता,पाणी, विद्युत पुरवठा,आरोग्य, रस्ते अशा  अनेक समस्यांना सध्या नागरिक त्रासले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे या विषयी मोहीम राबवली जात नाही. रस्ता, अतिक्रमण,घाणी संदर्भात अनेक वेळा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत कुठलीच कारवाई होत नसल्याने शेवटी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे."

दादासाहेब आगळे - सामाजिक कार्यकर्ते,गुंडेगाव



No comments:

Post a Comment